गदिमा/बाबूजी जन्मशताब्दी उत्सव कार्यक्रम


गदिमा आणि बाबूजी जन्मशताब्दीनिमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ आयोजित कार्यक्रमाचा आढावा

सागर साबडे
सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ
secretary@mmla.org 
यंदाचे वर्ष मराठी भाषिकांसाठी विशेष आहे.  महाराष्ट्राची तीन रत्ने - गदिमा, सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि पु ल देशपांडे यांची या वर्षी जन्मशताब्दी आहे.   गदिमा आणि बाबूजी जोडीने
एकेकाळी आपले शब्द ,स्वर व संगीत यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते.  सूर हे शब्द व त्यामागील भावनांना उमलवीत जातात. जसं शब्द व सुरांचं नातं अतूट असत, तसंच  गदिमा व बाबूजी यांचं नातं अतुट होतं. बाबूजीचे सूर व संगीताचे गुंजन आपल्या हृदयात कायमचे ठसले आहे आणि  शब्दांचे राजे असलेले,भक्तिगीतांपासून लावण्या व ग्रामीण संगीतापासून चित्रपट संगीत व गीतरामायण  रचणारे व ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतात  अशा गदिमांची अनेक गीते अजरामर झाली आहेत.
 

त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाने (MMLA) ९ फेब्रुवारीला सुधीर फडके आणि गदिमा यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून 'ज्योतिने तेजाची आरती' नावाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाची संकल्पना ज्यांना बाबूजींचा प्रत्यक्ष सहवास लाभला त्या डॉ. गोपाळ मराठे यांची होती (त्यांना येथे सर्वजण प्रेमाने गोपाळकाका म्हणून संबोधतात.).  गेले ४-५ महिने त्यांच्याबरोबर लॉस एंजेलिस परिसरातील अनेक हौशी कलाकारांनी गाण्याची, नृत्याची तयारी केली आणि सुमारे तीन तासाचा हा कार्यक्रम सादर केला.  अमेरिकेत वाढणाऱ्या नवीन पिढीनेही ह्यात सक्रीय सहभाग घेतला. महाराष्ट्र मंडळ समितीने कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडली. 

बाबूजींची अवीट गोडीची गाणी आणि गदिमांच्या अलौकिक प्रतिभेची झलक दाखवणारा हा कार्यक्रम नितांतसुंदर झाला आणि अनेकांना जुन्या आठवणींना उजाळा देता आला. ह्या द्व्ययीचे कामच एवढे सुंदर आणि अफाट आहे कि निवड करताना कोणती गाणी निवडावी आणि कोणती गाळावी हा अवघड प्रश्न होता.  गीतरामायणाच्या वेळी तर हे फारच अवघड होते - त्यामुळे अनेक गाण्यांची ध्रुवपदे गाण्यात आली!  तीन तासाच्या या कार्यक्रमात जवळजवळ ५० जणांनी सहभाग घेतला व २३ गाणी आणि ५ नृत्ये सादर करण्यात आली.  प्रत्येक गाण्याला अनुरूप निवेदन  सौ. नंदा मराठे यांनी लिहिले होते.  श्री. सारंग हरदास कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.   ह्या कार्यक्रमाला अनेकांनी योगदान दिले त्यामुळेच हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी होऊ शकला.  


जीवन गौरव पुरस्कार
१९७० च्या दशकांत गोपाळकाका  इकडचे रहिवासी झाले तेव्हा ते स्वतः गात असत. त्यानंतर त्यांनी पेटी, तबला व गायन शिकवायला सुरुवात केली.  गेली ३०-३५ वर्षे गोपाळकाका लॉस एंजेलिस परीसरात मराठी संस्कृती आणि गाणी टिकावी व वृद्धिगंत व्हावी म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यांनी गुणदर्शन नावाचा घरगुती कार्यक्रम  सुरु करून अनेक स्थानिक कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून वेळोवेळी प्रोत्साहन दिले.  बृहन्महाराष्ट्र अधिवेशनात त्यांचा महत्वाचा वाटा होता.  गोपाळकाकांच्या या चाळीस वर्षांच्या अविरत वाटचालीची दखल घेताना ह्या कार्यक्रमाचे निमित्त साधून  लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाच्या वतीने  जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.  त्यांना सदैव साथ दिल्याबद्दल त्यांच्या पत्नी सौ. नंदा मराठे यांचेही व्यासपीठावर अभिनंदन व कौतुक करण्यात आले.  त्यांची दुसरी व तिसरी पिढीही ह्या कार्यक्रमात संगीत आणि नृत्य दोन्हीमध्ये सहभागी होती हे त्यांच्या संस्कारांचेच यश म्हणावे लागेल. गोपाळकाकांसारखी माणसे लॉस एंजेलिस परिसरात राहतात आणि मंडळाची संलग्न आहेत हे आमच्या मंडळाचे सौभाग्य!

येत्या एप्रिलमध्ये पुलंना आदराजंली म्हणून असाच एक आगळावेगळा कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्र मंडळ प्रयत्नशील आहे.  



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम

६ मॅरेथॉन पूर्ण करणारे अबॉट विजेते लॉस एंजेलिस येथील श्री. सतीश कोल्ढेकर यांची मुलाखत